लग्न करताय विचार करा, लग्नाळू तरूणांना घातला जातोय आर्थिक गंडा !
आष्टीत बनावट लग्न लावून देणारी टोळी
बीड प्रतिनिधी – कडा आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अविवाहित तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक तरुण बागायतदार आहेत. परंतु, हाताला उद्योग धंदा, नोकरी नसल्यामुळे त्यांचे लग्न होत नाही. अशा लग्नाळू तरूणांना आर्थिक गंडा घातल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. लग्न लागल्यानंतर हळदीचा डाग पुसत नाही तोच नवरी दागिने, रोख रक्कम घेऊन पसार होतात. तालुक्यात अशा प्रकारचे रॅकेट सक्रिय झाले असून तरुणांनो काळजी घ्या, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
आष्टी तालुक्यातील १७७ गावांत मोठ्या प्रमाणावर तरूण अविवाहित आहेत. घरी शेती, घर असतानाही केवळ नोकरी नसल्याने मुली देण्यास पालक कानाडोळा करतात. त्यामुळे अविवाहित तरुणांना लग्नासाठी मुली शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच काही महिन्यांपासून आर्थिक गंडा घालून विवाह लावून देणारी टोळी सक्रिय झाली आहे.
बनावट नातेवाईक लग्नासाठी नवरी घेउन येतात. मोजक्याच नातेवाईकांची बैठक घेऊन स्थळ पक्के केले जाते. लग्नासाठी मुलीकडील नातेवाईक अविवाहित तरुणाकडून लाखो पैसे उकळतात.
लग्न लागल्यानंतर सर्वजण मिळून पैसे वाटून घेतात. नवरी नवरदेवाच्या घरी गेल्यावर काही दिवस राहते आणि सावरा सावर होताच पसार होते. फसवणूक झालेले तरुण भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे पळून जाणाऱ्या नवरी मुलींचे फावते.
नातेवाईकांची खात्री करूनच लग्न करा
■ अविवाहित तरुणांनी लग्न जमवताना आर्थिक देवाणघेवाण करू नये. लग्न जमल्यानंतर नातलगांची चौकशी करावी.
■ मुलगी नात्यातीलच आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहन आष्टीचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी केले.